कोणतीही पूर्वकल्पना न देता शेती पंपांचे कनेक्शन्स तोडले
पुसेगाव- महावितरणाच्या अजब कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत मंडळाकडून शेती पंपाचे कनेक्शन कट करण्याचे काम सुरू आहे.
सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास मुश्कील झाले आहे. शेतीमालाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यात आणखी एक भर म्हणून ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने सक्तीने थकित वीज बिल वसुली सुरू आहे. यापूर्वी घरातील वीज बिल थकीतदार यांचे वीज कनेक्शन कट केले आहेत.
हा सर्व विषय शेतकऱ्यांनी सहन केला. परंतु,दोन- तीन दिवसांपासून दिवाळीच्या तोंडावर कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज तोडण्याचा धडाका विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देता येत नाही. विहिरीत पाणी असूनसुद्धा ते पाणी वापरता येत नाही.
त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून हातातोंडाशी आलेली पिके पाण्यावाचून जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. शेतकऱ्यांना दिवाळी सुखाने खाऊ द्या, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी सांगितले.
आमदार महेश शिंदे यांची भेट घेऊन हा सर्व विषय चर्चेदरम्यान मांडणार असून संबंधित विभागाला कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती करणार आहे. अन्यथा शिवसेना पक्षातर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.