पुणे – हिंदुत्वाच्या मुद्दावर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेत मनसेने भाजपसोबत जावं असा सल्ला दिला होता. आता यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल मत व्यक्त केलं आहे.
मंत्री आठवले यांनी राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला इशारा दिला. भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, असं म्हणत भाजपाला मनसेमुळे नुकसान होऊ शकतं, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिला.
दरम्यान आरपीआयला पुण्यात आणि मुंबईत महापौर पद मिळावं, अशी मागणी देखील आठवले यांनी केली.