वंदना बर्वे
नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणाऱ्या नेत्यांचा सोनिया गांधी यांनी आज चांगला समाचार घेतला. मीच कॉग्रेसची पूर्णकालीन अध्यक्ष आहे आणि मिडीयाच्या माध्यमातून पक्षाशी चर्चा करण्याची सवय सोडून द्यावी, अशा सूचक शब्दात सोनिया गांधी यांनी ‘जी23’ गटाच्या नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला.
सोनिया गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कॉग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत ‘जी23’ गटातील नेत्यांना आरसा दाखविला. कॉग्रेसमध्ये पूर्णकालीन अध्यक्ष नाही मग निर्णय कोण घेत आहेत? अशाप्रकारचे विधान करून कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न सुरू होते. एवढेच नव्हे तर, गुलाम नबी आझाद यांनी चित्र स्पष्ट करण्यासाठी कार्यसमितीची बैठक बोलाविण्याची मागणी केली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी तिसरा डोळा उघडताच जी23 गटाचे सदस्य शांत झाले. मी 24 तास पक्षाचे काम करीत आहे. मीच पक्षाची पूर्णकालीन अध्यक्ष आहे. म्हणून या मुद्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करून भ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जावू नये, असेही सोनिया गांधी यांनी सुनावले असल्याचे समजते.
कॉंग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि पक्षाच्या व्यासपीठावर बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांना प्राप्त आहे. परंतु, मीडियाच्या माध्यमातून पक्षाशी चर्चा करण्याची सवय योग्य नाही. यामुळे पदाधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असा डोज सुध्दा सोनिया गांधी यांनी नाव न घेता असमाधानी गटाच्या नेत्यांना पाजला.
कॉंग्रेसच्या अध्यक्षापासून ते ब्लॉक अध्यक्षाची निवड करण्यासाठी एक नोव्हेबरपासून निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे आक्टोबर 2022 मध्ये कॉग्रेसचा नवीन अध्यक्ष निवडला जाईल.
नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत आहे. लोकांमध्ये केंद्र सरकारप्रती नाराजी वाढली आहे. यामुळे भाजपची प्रतिमा चांगली करण्यासाठी सुरक्षा एजंसीचा वापर केला जात आहे. एसी एसटी अल्पसंख्याक महिला आणि मागासवर्गीयाच्या अधिकारांवर हल्ले होत आहेत, या मुद्द्यावरही आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
मोदी यांना 25 लाख कोटीची कृषी व्यवस्था आपल्या मोजक्या व्यापारी मित्रांच्या हाती सोपवायची आहे. म्हणूनच एक वर्षांपासून चाललेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तिन्ही कृषी कायदे लागू करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, यावरही चिंता व्यक्त करण्यात आली असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
देशव्यापी जनजागृती मोहिम
कॉग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौफेर अपयशाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रव्यापी जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे हाताळण्यात कशाप्रकारे अपयशी ठरत आहे आणि काही मोजक्या उद्योगपतींना आणखी श्रीमंत करण्यासाठी विविध डावपेच आखत आहे, याची इत्थंभूत माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे, असे कॉग्रेस सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.