कोल्हापूर (प्रतिनिधी) : टिप्परद्वारे घरोघरी जाऊन 100 टक्के कचरा उठावाबाबतचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या नियोजनाची माहिती देण्याबरोरबरच माजी पदाधिकाऱ्यांच्या याबाबतच्या सुचनाही जाणून घेण्यासाठी गुरुवारी बैठक घेण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी माजी महापौर सौ.निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी गटनेते शारगंधर देशमुख, सत्यजित कदम, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरामधील कचरा 100 टक्के उठावाचे नियेाजन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले असलेचे सांगितले. शहरामध्ये एक हजार कंटेनर होते. यापैकी प्रत्येक प्रभागामध्ये 3 ते 4 कंटेनर ठेवण्यात आले होते. घरोघरी कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरु झाल्यानंतर 800 कंटेनर काढण्यात आले.
उर्वरीत 200 कंटेनर मुख्य चौक, भाजी मार्केट, गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. नागरीकांनी आपल्या दारी येणाऱ्या टिपरकडे कचरा द्यावा. घरोघरी कचरा संकलनासाठी महापालिकेच्यावतीने टिप्परच्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. सध्या 104 टिप्पर कचरा संकलन करीत आहेत. नविन 65 टिप्पर पैकी 52 टिप्पर सकाळी 7 ते 3 या वेळेत कचरा संकलनासाठी जादा देण्यात येणार आहेत.
त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये जुन्या व नव्या घंटागाडीद्वारे दैनंदिन कचरा संकलन केला जाणार आहे. त्याचबरोबर 8 टिप्पर दुपारी 3 ते रात्रौ 10 या वेळेत व्यापारी भागात कचरा उठावासाठी ठेवण्यात येणार आहेत. नविन टिप्पर पैकी 13 टिप्पर मेंन्टनंन्ससाठी आलेल्या टिप्परच्या बदली स्पेअरला दिल्या जाणार असलेची माहिती प्रशासकांनी दिली.
उप आयुक्त रविकांत आडसूळ यांनी 2 जेसीबी, 3 डंपर व 15 ट्रॅक्टरद्वारे कंटेनर काढण्यात आलेल्या ठिकाणी व प्रत्येक प्रभागात फिरती करुन दैनंदिन कचरा उठाव करण्यात येणार असलेचे सांगितले. जुने 104 टिप्पर व 65 नविन टिप्पर याद्वारे पुर्ण क्षमतेने घरोघरी कचरा ओला व सुका संकलन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडे कर्मचारी कमी असलेने या विभागाकडील इतर विभागाकडे काम करणारे कर्मचारी पुन्हा आरोग्य विभागाकडे वर्ग केले जाणार आहेत.
नागरीकांच्या कचऱ्या बाबतच्या तक्रारीसाठी स्वच्छ भारत मिशन ॲप कार्यान्वीत आहेच. त्याचबरोबर आरोग्य विभागाकडील एक मोबाईल क्रमांक जाहिर केला जाणार आहे. या नंबरवर नागरीकांना कचऱ्याबाबतीत तक्रारी व व्हॉटस ॲपवर कचऱ्याचे फोटो टाकता येतील. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमून दैनंदिन देखरेख करता येणार आहे. मुख्य आरोग्य निरिक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी यांना नेमून दिलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कचऱ्याचे ढिग आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असलेचे सांगितले.
माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी शहरामध्ये महावितरणच्यावतीने विद्युत ताराजवळील झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. त्या छाटल्यानंतर रस्त्याच्या कडेला टाकल्या जातात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढिग होतो. यासाठी महावितरणशी संपर्क करुन ते ज्या मार्गावर फांद्या छाटणार आहेत त्याठिकाणी महापालिकेच्यावतीने एक डंपर उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन महापालिकेला रस्त्याकडेला पडलेल्या फांद्या पुन्हा उठाव कराव्या लागणार नाहीत. लक्ष्मीपूरी येथे रविवारी बाजार भरतो. सोमवारी या बाजारातील कचरा जेसीबीच्या सहाय्याने उठाव करावा लागतो. त्यामुळे जेसीबीने कचरा उठाव करताना रस्ता खराब होत आहे. यासाठी काहीतरी नियोजन करावे.
माजी गटनेते शारगंधर देशमुख यांनी गावठान व व्यावसायीक क्षेत्रामध्ये 1 ट्रॅक्टरद्वारे कचरा उठाव करणे शक्य नाही. जेसीबी व डंपर पंक्चर झाल्यास तातडीने पंक्चर काढणेसाठी मटेरियल मिळत नाही. यासाठी आरोग्य विभागाला कामासाठी देण्यात येणारी सर्व साधनसामुग्री, यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. वर्कशॉप विभाग सक्षम असणे गरजेचे आहे. घंटागाडीवर कचरा गोळा करताना एखादा नागरीक ओला व सुका कचरा वेगवेगळा देत नसेल तर त्याचा कचरा घेण्यात येऊ नये. असे केले तरच नागरीकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याची सवय लागेल. बायोगॅस प्लॅन्टचे विकेद्रींकरण करा. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचेल कचरा उठाव जलद होईल. कामावर वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशा सुचना केल्या.
माजी गटनेते सत्यजित कदम यांनी प्रभागामध्ये काही आरोग्य कर्मचारी काम करत नाहीत. थोडे काम करतात व बसून राहतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भागामध्ये कर्मचाऱ्यांच्या पेक्षा मुकादम जास्त झालेले आहेत. सकाळी वेळेवर सफाई कर्मचारी येत नसलेने बायोमॅट्रीक हजेरी चालू करा. जुने कंटेनर उघडयावर रस्त्याकडेला पडलेले आहेत. ते गायब होण्याअधी स्टोअर विभागाकडे जमा करुन घ्या. जेसीबी व डंपर वारंवार मेंन्टनंन्सला येत असतील तर भाडयाने घ्यावेत अशा सुचना केल्या.
माजी गटनेते राहुल चव्हाण यांनी माझ्या ऑफिस समोरील कचरा गेले 10 दिवस झाले उठाव करण्यात आलेला नाही. काही कामगार कामावर हजर नसतात. सतत गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असलेचे सांगितले. यावेळी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, सर्व आरोग्य निरिक्षक आदी उपस्थित होते.