बोस्टन – लखीमपुर खेरीतील हिंसाचारात चार शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागली ही घटना निषेधार्हच आहे अशी जाहींर कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेतील एका जाहीर कार्यक्रमात दिली आहे.
अशा प्रकारच्या घटना देशाच्या अन्य भागातही घडत असतात. त्यावेळीही अशाच प्रकारचा आवाज उठवला गेला पाहिजे, आपल्याला सोयीच्यावेळी अशा प्रकारचा आवाज उठवणे योग्य नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार आहे म्हणून त्यासंबंधात जोरदार आवाज उठवणे सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
हॉवर्ड केनडी स्कुल मधील एका कार्यक्रमात त्यांनी लखीमपुर खेरी मध्ये भाजपच्या मंत्रीपुत्राकडून चार शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याविषयी त्यांना प्रश्न विचारला गेला होता. अमेरिकेतही या घटनांचे पडसाद उमटू लागल्याचा अनुभवही त्यांना आला. या घटनेवर पंतप्रधानांकडून एका शब्दाचीही का प्रतिक्रीया आली नाही असा प्रश्नही त्यांना तेथे विचारला गेला.
अशा स्वरूपाचे प्रश्न सरकारला जेव्हा विचारले जातात त्यावेळी सरकारकडून नेहमीच बचावात्मक प्रतिसाद का दिला जातो असेही त्यांना विचारले गेले. त्यावर मोघम उत्तर देऊन त्यांनी मार्ग काढला. देशाच्या अन्य भागातही अशा घटना घडतात त्यावेळीही असेच प्रश्न उपस्थित का केले जात नाहीत ही माझी चिंता आहे असे त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांचे दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे त्यावरही त्यांना प्रश्न विचारले गेले. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की जे तीन कृषी कायदे आणले गेले आहेत ते कायदे संसदीय समित्यांमध्ये अनेक दशके चर्चीले गेले आहेत. प्रत्येक घटकांशी चर्चा करूनच हे कायदे आणले गेले आहेत असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनला मर्यादित स्वरूप आहे असे सांगण्याचाही प्रयत्न त्यांनी केला.
सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची नेहमीच तयारी दर्शवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण नेमके कशासाठी आंदोलन करीत आहोत हे आंदोलकांनाच माहिती नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. मोदी सरकारने शेतकऱ्यांना सर्वाधिक एमएसपीचे दर त्यांच्या पिकांना दिले आहेत असा दावाही त्यांनी केला.