नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेनंतर राज्यातल्या राजकारणापासून दिल्ली पर्यंत वातावरण तापले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केल्यापासून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. तर दुसरीकडे प्रियांका गांधी यांच्या हातातल्या झाडूवरूनही राजकारण करण्यात येत आहे. त्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा प्रियांका गांधींनी हातात झाडू घेतला आहे.
लखीमपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून सीतापूर इथल्या गेस्टहाऊसवर काही काळ ठेवले. या काळात प्रियांका गांधींनी गेस्ट हाऊसमधली खोली झाडून स्वच्छ केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खोचक शब्दांत टीका करताना प्रियांका गांधींवर निशाणा साधला होता.
आज उप्र के मुख्यमंत्री ने जातिवादी बयान देकर अपनी दलित विरोधी मानसिकता दिखाई।
कल उप्र की सभी जिला कांग्रेस कमेटियां भगवान वाल्मीकि मंदिर में सफाई करेंगी।
देश के करोड़ों दलितों और महिलाओं का अपमान भारत बर्दाश्त नहीं करेगा। pic.twitter.com/RRcT9RmhGG
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 8, 2021
“काँग्रेस नेत्यांना तेवढंच करण्याच्या उपयोगाचं ठेवायची जनतेची इच्छा आहे. आणि तेच जनतेनं त्यांना करायला लावलं आहे. अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी प्रियांका गांधींवर टीका केली होती. याच टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधींनी पुन्हा एकदा हातात झाडू घेऊन लखनौमधील वाल्मिकी मंदिरात साफसफाई केली.
त्यासंदर्भात लखनौमधल्या लवकुश नगरमध्ये बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, “असे बोलून योगी आदित्यनाथ यांनी फक्त माझाच नाही तर तुम्हा सगळ्यांचा अपमान केला आहे. कारण कोट्यवधी दलित बंधू-भगिनी सफाई कर्मचारी आहेत आणि ते हे काम करतात.” मुख्यमंत्र्यांच्या याच विधानामुळे आपण हातात झाडू घेऊन वाल्मिकी मंदिरात साफसफाईचा निर्णय घेतला, कारण मला योगी आदित्यनाथ यांना हे दाखवायचं होतं की या कामात चुकीचं असं काहीच नाही, असे देखील प्रियांका गांधींनी म्हटले आहे.