बेळगाव – राज्यासह देशात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यातच बेळगावमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसात घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटा बेळगावमधील बादल अंकलगी गावात बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यात मृत्यू पावलेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंकलगी गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन आठ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे.