नवी दिल्ली – भारताच्या टेबल टेनिसपटूंनी आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेत तीन पदके मिळवताना इतिहास रचला आहे. कतारमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिसपटूंना दुहेरीत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांनी ब्रॉंझपदकाची कमाई केली.
दुहेरीतील उपांत्य लढतीत हरमीत देसाई आणि मानव ठक्कर या जोडीला वूजीन जैंग आणि जोंगहू लिमची या दक्षिण कोरियाच्या जोडीकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑलिम्पिकपटू अचंथा शरथ कमल आणि साथियान या जोडीला युकिया उदा आणि शुंसुके तोगामी या जपानच्या जोडीकडून 3-0 असा निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. एकेरी गटातही भारताच्या हाती निराशा लागली.
अचंथा शरथ कमलला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या सांग सू याने 3-0 असे नमवले. याच गटातील अन्य लढतीत भारताच्या सुनिल शेट्टीसह साथियानलाही पराभवाचा सामना करावा लागला.
महिलांच्या गटात दुहेरीत सुतीर्था मुखर्जी व ऐहिका मुखर्जी या जोडीलाही अपयश आले. तसेच अर्चना कामथॉत आणि श्रीजा अकुला हीलाही अपयश आले.