नमस्कार, मी… बोलतोय, अशी फोनवर सुरुवात झाली, की बोलण्यात एक आदब येते. तसं भेटल्यावर नमस्कार म्हणणं किंवा राम राम करणं ही खरं तर जुनी परंपरा आहे. आपल्याकडे पूर्वी सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी परवचा म्हटल्यावर घरातील वडिलधाऱ्या सर्वांना वाकून नमस्कार करण्याची पद्धत होती.
तसंच प्रथम कुणी मोठी माणसं घरी आली आणि लहानांची ओळख करून दिली की हा माझा मुलगा, मुलगी, सून तर लगेच पाया पडायला सांगितले जाई. परीक्षेला जाताना, गावाला जाताना किंवा गावाहून आल्यावरही घरातील मोठ्या माणसांना नमस्कार केला जातो.
नमस्कार करणं ही आपल्याकडील एक उत्तम पद्धत आहे. यातून शरीराला वाकण्याचा व्यायाम तर होतोच, पण ज्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो तिच्या विषयीच प्रेम, आदर ही त्यातून आपोआप व्यक्त होतं आणि ज्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो, त्यांचे तोंडातून आपोआप आपल्यासाठी शुभेच्छा, आशीर्वाद बाहेर पडतात. पूर्वी नवविवाहितांना खमखास अष्टपुत्रा सौभाग्यवती भव… हा आशीर्वाद दिला जायचा. कालांतराने मात्र त्यात बदल होत गेले. आता सुखी राहा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, आनंदी राहा, हल्ली तर निरोगी राहा, सुरक्षित राहा… असेही आशीर्वाद दिले जातात.
नमस्कार करण्याची रित अजूनही बहुतेक घरात पाळली जाते. परंतु हळूहळू ते मागे पडते आहे, असे जाणवते. खूप दिवसांनी भेटल्यावर “हाय’ करून गळा मिठी घालण्याचं प्रमाण वाढत चालले आहे. यातसुद्धा प्रेम आहे पण नमस्कार करण्यात मार्दव आहे.
आपले आईवडील, गुरूजन, वयाने, मानाने, शिक्षणाने वडील असणाऱ्या व्यक्तींना मान देऊन जरूर नमस्कार करावा. तो त्यांचा सन्मान तर असतोच पण आपल्यातला मीपणाही त्यातून अंशाने कमी होत असतो. व्यक्तींबरोबर हा विश्वनिर्माता परमेश्वर त्याला नमस्कार करताना तो अगदी अंतःकरणपूर्वक श्रद्धेने करावा. तू आहेस म्हणून मी आहे ही भावना ठेवावी व त्याला शरण जावे.
वडिलधाऱ्या लोकांकडून नमस्कार केल्यावर जो आशीर्वाद मिळतो, तो फार मोलाचा असतो. त्यातून सकारात्मकता मिळते. ते एक अभेद्य कवच असते आणि मनापासून केलेले अभिष्टचिंतन असते.मंडळी, नमस्कार… तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद सतत पाठिशी राहू देत…इतकेच.
-आरती मोने