मुंबई – काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे यावरून अनेक राजकीय चर्चा होताना दिसून येत आहे. कॉंग्रेसचे अध्यक्षपद राहूल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पर्यायाने सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद आलं.
मात्र अद्यापही कॉंग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही यावरून शिवसेना खासदार संजय राऊत कॉंग्रेसला सल्ला देताना म्हणाले की, “जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही”
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसची अवस्था हेडलेस अर्थात नेतृत्वहीन झाली आहे. “जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेत आहेत. असा सल्ला राऊतांनी आज कॉंग्रेसला दिला आहे.
काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वानं अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल”. असेही ते म्हणाले.
काँग्रेसला अध्यक्ष हवा की नको हा काँग्रेसचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य केलं आहे. अनेक मोठे नेते दिले आहेत.
अशा वेळी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. आज राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही. जर कुणी तशी मागणी केली तर ती मागणी योग्य असेल की काँग्रेसचा अध्यक्ष कुठे आहे?” असा सवालही राऊतांनी केला आहे.