मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला सामोरे जात होते. पण, अनेक वेळा समन्स देऊनही परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर हजर झाले नाहीत. यामुळे आता ते देश सोडून रशियाला गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, परमबीर सिंह भारत सोडून पळून गेल्याचं वृत्त खरं असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपची निश्चित भूमिका असणार आहे. परमबीर सिंहाना वाचवणं भाजपसाठी गरजेचं आहे.
एनआयएच्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटलं की, वाझे परमबीर सिंहांना रिपोर्ट करत होता.
परमबीर यांनी जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेवर अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी ढकलण्यासाठी सायबर तज्ञाला 5 लाख दिले. तरीही परमबीर पळून गेले, यावेळी चौकीदार सरकार काय करत होतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जर परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले हे सत्य असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपाची निश्चित भूमिका असणार आहे. परमबीर सिंहना वाचवणे #bjp साठीच गरजेचे आहे. सर्वाआधी #NIA ने #Antilia प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. NIA च्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 1, 2021
याआधी नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या आणि परमबीर सारखे लोक देश सोडून पळून जातायत. मात्र चौकीदार सरकार सातत्याने झोपेचं सोंग घेतलेले का आढळतं ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.