सुरेश डुबल
कराड – महाविकास आघाडीने सुरुवातीला नगरपालिकांमध्ये एक सदस्यीय वॉर्ड पद्धत जाहीर केली. मात्र या निर्णयात बदल करत पुन्हा एकदा पूर्वीसारखीच द्विसदस्यीय प्रभाग पद्धती अवलंबल्या. त्यामुळे सिंगल वॉर्ड मध्ये निवडून येण्याचे स्वप्न बघणाऱ्या लहान कार्यकर्त्यांच्या नशिबी पुन्हा सतरंज्या उचलणे आले आहे. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत लहान कार्यकर्त्यांचा टिकाव लागत नाही. हे हरल्याने या कार्यकर्त्यांचा नगरसेवक होण्याचा चान्स यंदा ही हीरावला गेला आहे.
राज्यात निवडणुकांचे वातावरण तयार झाले आहे. डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप सरकार राज्यात सत्तेवर असताना त्यांनी नगरपालिकांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग रचना अमलात आणली. मात्र राज्यात सत्ता बदल होताच महाविकास आघाडीने भाजपचा फॉर्मुला बाजूला करत पुन्हा नगरपालीकांनध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना जाहीर केल्या. मात्र काही महिन्यातच हा निर्णय बदलण्यात आला आणि दोन दिवसापूर्वी नगरपालिका क्षेत्रामध्ये पूर्वीसारखेच द्विसदस्यीय प्रभाग रचना जैसे त्या ठेवल्या. या निर्णयामुळे कही खुशी, कही गम अशी अवस्था कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
राजकारणात एक अलिखित नियम आहे. राजकीय नेत्यांचा वारसदाराला थेट राजकारणात एंट्री मिळते. मात्र याव्यतिरिक्त राजकारणात येऊ पाहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधी सतरंज्या उचलाव्या लागतात तेव्हा मग कुठे नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य होता येते. सध्या पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. सुरूवातीला एक सदस्यीय प्रभाग असल्याने आणि या प्रभागात मतदारांची संख्या कमी असल्याने गल्लीगल्लीतील कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले होते.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ते कार्यकर्ते देखील आपण यंदा नगरसेवक होणारच या आशेने खादी चढवुन बसले होते. आपल्या प्रभागामधील लोकांच्या गाठीभेटी घेणे, सामाजिक कार्यात हातभार लावणे, युवकांपासुन ते आबालवृद्धांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे अशा सर्व पद्धतीने मतदार बांधणी प्रभागातील लोकल नेत्यांनी सुरू केली होती.
जेणेकरून आपण कमावलेल्या लोकांच्या व पक्षाच्या पाठिंब्यावर यंदा नगरसेवक होता येईल, अशी स्वप्ने त्यांना पडली होती. किती दिवस फक्त सतरंज्या उचलायच्या, असे मनोमन वाटणाऱ्या लहान कार्यकर्त्यांना नगरसेवक व्हावे, असे वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले.
मात्र दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने पूर्वी घेतलेला निर्णय फिरवला आणि पुन्हा एकदा द्विसदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या गल्लीतील सच्चा कार्यकर्त्यांला नगरसेवक होण्यात आडकाठी आली. द्विसदस्यीय प्रभाग रचनामध्ये आपली काही डाळ शिजणार नाही, हे लहान कार्यकर्ते ओळखून आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा धसका घेत या छोट्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
अपक्षांकडे लक्ष देण्याची गरज कमी
एक सदस्य प्रभागात मतदार संख्या कमी असल्याने या अशा प्रभागातुन ठिकाणी निवडून येणे शक्य असल्याने बरेच जण इच्छुक असतात. त्यामुळे अशा प्रभागात प्रत्येक उमेदवाराला चांगला भाव येतो. मात्र द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदार संख्या जास्त असल्याने अपक्षांची संख्या कमी असते. पालिकेच्या निवडणुकीत आता द्विसदस्यीय प्रभाग असल्याने आघाडीच्या लोकांना अपक्षांकडे लक्ष देण्याची तितकी गरज पडत नाही.