मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीला ही माहिती दिली. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ही परजिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्यच असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.