चंदिगड – भारतीय अर्थव्यवस्था दमदारपणे वाटचाल करीत असून आगामी काळातही विकास दर वाढणार असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. भारतीय शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले असतानाच अर्थमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या की, गेल्या काही दिवसापासून अर्थव्यवस्था कमालीच्या वेगाने पुनरुज्जीवित होत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. जीएसटी कर संकलन वाढले आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष कर संकलनातही वेगात वाढ होत आहे. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसत असून भारतीय शेअर बाजार निर्देशांक वेगाने वाढत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील खरेदी वाढत आहे.
भारतीय अर्थव्यवस्था करोनापूर्व परिस्थितीत कधी येईल असे विचारले असता, सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्था अगोदरच पूर्वपदावर आली आहे. त्यामुळेच कर संकलन वाढत आहे. अर्थसंकल्पामध्ये जी उद्दिष्ट ठरविण्यात आली होती, त्यानुसार करसंकलन वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जीएसटी संकलन महिन्याला 1.12 लाख कोटीपर्यंत गेले आहे. हा आकडा 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत स्थिर होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याबद्दल सीतारामन म्हणाल्या की, गुंतवणूकदार सर्व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत असतात.
शेअर बाजाराचे कामकाज पारदर्शक आहे. त्याचबरोबर नव्या कंपन्या नियमानुसार नोंदल्या जात आहेत. किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करीत होते. मात्र आता हे गुंतवणूकदार थेट शेअरची खरेदी करू लागले असल्याचे वातावरण आहे.
केंद्र सरकारने करोनाच्या काळामध्ये अतिशय काळजीपूर्वक पॅकेज तयार केली होती. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना मदत मिळाली आणि अर्थव्यवस्थेचे जास्त नुकसान झाले नाही. त्यामुळेच अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे असे त्यांनी सांगितले.