रेडिओवर खूप दिवसांनी गाणे ऐकायला मिळाले, “सिर्फ एहसास है ये, रुह से मेहसूस करो’ यातील “एहसास-मेहसूस’ शब्दच जादू करणारे. “संगीता’त प्रचंड ताकद-शक्ती आहे. गरज आहे तो “एहसा’ “मेहसूस’ करून घेण्याची आपण किती वापर करतो, त्याचा आपल्या जगण्यासाठी? रोजच्या तणावाखाली, धावपळीच्या यंत्रवत जगण्यात आपले “मेहसूस’ करणे-जाणवून घेणे बोथट झाले आहे.
गीताचे अनेक प्रकार प्रत्येकाच्या धर्म, देश-परंपरेप्रमाणे वेगवेगळे आहेत. संगीत परिणामकारक ठरण्यासाठी अनेक कलाकार, गीतकार, संगीतकार, गायक, वादक प्रचंड मेहनत घेत असतात. त्यात केलेला वाद्यांचा वापर त्या वादकाचे कौशल्य दाखवून जातो. प्रत्येक गीतकार, संगीतकार, गायक यांची शैली, पद्धत वेगवेगळी आहे, म्हणूनच आपल्याला यात वैविध्य अनुभवायला मिळते. प्रत्येक भाषेचा, लहेजा, त्यातील उच्चार व शब्द यांचे सौंदर्य अप्रतिमच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या रचनेत ओतलेल्या भाव-भावना केवळ अप्रतिमच.
संगीत आणि निसर्गाचा मुक्ताविष्कार जणू एकमेकांसाठीच बनलेले आहेत. निसर्गातील प्रत्येक ऋतूचे, प्रत्येक बारीक-सारीक तपशिलाचे वर्णन संगीतामध्ये ऐकायला मिळते. कधी त्यात मनोसक्त चिंब भिजून घ्यावे तर कधी पाय थिरकून घ्यावे. जगजीतजींचे “कागज की कश्ती, बारीश का पानी’ तर बालपणीची हवीहवीशी पण हातातून निसटून गेलेली आठवण.
पंकजजींचे “चिठ्ठी आयी है, बडे दिनोंके बाद’ हे ऐकून तर आपले मन-शरीर शहारून आल्याशिवाय राहात नाही, डोळ्यांच्या ओलाविलेल्या, पापण्या आपल्याला आपली नव्याने ओळख करून देतात. सुरेशजी व लतादिदींनी गायलेले “इन हसीन वादीयोंसे दो चार नजारे चुरा ले तो चले’ यांत “दो-चार नजारे’ चुराना काय असते, पण कल्पनाच भारी. कदाचित हेच आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण असतील.
“हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश-वेडी ओल्या दवात न्हाली’ काय असते, ओल्या दवात न्हाणे? कधी आपण याचा अनुभव घेतला आहे का? पं. जितेंद्र अभिषेकी यांचे “सर्वात्मका-सर्वेश्वरा’ जणू आर्त सादच, त्यात मनाने लीन व्हायला वेळ नाही लागत. तेच मन “बुगडी माझी सांडली’ला खट्याळ होऊन जाते. “टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’ सुंदर कल्पना या आपल्या कल्पने पलीकडच्या.
“मामाच्या गावाला जाऊ या’ यात तर खूपच धमाल, जगातले सगळे ऐश्वर्य खर्च केले तरी मामाच्या गावाचा असा आनंद मिळणार आहे का? अगदी दूरदर्शनवरसुद्धा, “मिले सूर-मेरा तुम्हारा’, वा “चंदा एक तारे अनेक’ या सारख्या अवीट आठवणी देणारी संगीत रचना याची कोठेच तुला होऊ शकणार नाही. “अफजल खान वधाचा’ पोवाडा ऐकला तरी सगळेच चित्र-घटना डोळ्यांसमोर उभी राहते.
जणू आपणच या रोमांचकारी घटनेचे साक्षीदारच. शाहिरांचे कौशल्य असते ते. “वेडात वीर दौडले’ ऐकले तरी रक्त सळसळते. “कांदा-मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ यात भगवंताला भेटायला, खूप दूर नाही, जायला लागत. आपल्या कामातच आहे. भगवंत जणू आयुष्याचे तत्त्वज्ञानच आपले मूल्य-शिक्षणच जणू याद्वारे होत असे. आता शाळा कॉलेजमध्ये अनेक ऑफिसेसमध्ये तणावमुक्तीचे धडे, उपाययोजना शिकवल्या जातात. पण संगीत, निसर्गालाच आपले गुरू केले तर?
शहनाईचे मंगल स्वर जणू मन-वातावरण मंगलमय पवित्र झाल्याचे जाणवून देतात. आपण पिढीजात शत्रुत्व अभिमानाने दाखवतो. मिरवतोसुद्धा; पण त्याचे दाहक परिणाम तर अनुभवतोच ना. जरुरी आहे का असे दाखवणे? कधी प्रेम व्यक्त करून पाहावे, त्या प्रेमात स्नेह हवा, आश्वासकपणा हवा. पण विकृती नको, विकृती आली की प्रेमातले पावित्र्य, विश्वास संपून जातो, जरुरी नाही की, प्रेमाचा हा सहवास शरीराचा हवा, पण मनाचा सहवास, शब्दांचा सहवास, नजरेतील आधार खूप काही सोबत करते, बळ देते.
आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मिळालेले प्रेम केव्हाही अमूल्यच. “जगण्यासाठी’ धडपड प्रत्येक जण करतो, पण “जगवण्यासाठी’ धडपड कधी करून पाहावी. अगदी मुक्या प्राण्यांवरसुद्धा किती तरी संगीत रचना केल्या गेल्या. त्या ऐकल्या तरी मनात “वात्सल्य’ जागृत होतेच ना! संगीताने आपल्याला खूप काही दिले आहे. “व्याही-विहीण’ या नात्यावरसुद्धा “हम आपके है कोन’ मधले गीतसुद्धा छानच. प्रत्येक नात्याचा “मान-आब’ राखला जाईल, अशाच या रचना.
शाहीर अनंत फंदी यांची रचना आपण “सरळ मार्गाने धोपट मार्गाने’ कसे वागावे जगावे याचा जणू वस्तुपाठच. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वेळी साथसोबत करणाऱ्या सांगितिक रचना केवळ आपल्याचसाठी आहे. कधी “ओरबाडणारे’ होण्याऐवजी “फुलवणारे’ होऊन पाहावे. एखाद्याची मन:शांती, आयुष्यातील “चैतन्य’ घालवणारे होण्याऐवजी कधी “मनाची ताकद’ होऊन पाहावे. कधी कधी गैरसमज, रागाच्या किंवा इतर कोणत्याही कारणाने रागाच्या किंवा इतर कोणत्याही कारणाने “आपले जवळचे’ दुरावल्यास मनापासून चूक कबुल करून मोकळे व्हावे. खूप वेळ निघून जाते आणि परतीचे मार्गसुद्धा बंद होतात. मग काही शिल्लक राहात नाही.
कधी आपल्या प्रवासात कुणी सोबत असेल, तर कधी लक्षात येईल की, आपण “एकटेच’ राहिलो आहोत. काय फरक पडणार आहे? ज्याला आपल्या सोबतीचे महत्त्व, सन्मान असेल तर तो कायमच आपल्या सोबत राहील. आपल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये हीच सोबत कायम राहील. काळपरत्वे सोबतीच्या कल्पनासुद्धा बदलत जातात. कधी आपल्या आवडीच्या संगीत रचनेच्या कल्पनेत रमून पाहावे. खूप छान वाटते. त्या संगीत लहरी मनाला प्रसन्न करतात. चांगल्या कल्पनेत रमताना इतर गोष्टींचा विसर पडतो. प्रचंड ऊर्जा मिळते.
कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करणे व टिकवणे, बरेवाईट प्रसंग येतील आयुष्यात, पण आपण एखाद्याला केलेली सोबत, स्नेह, प्रेम या कायम चिरंतन राहतील. निर्जीव वस्तूसुद्धा संगीत या माध्यमाने जिवंत केल्या आहेत, आपण तर हाडामासांचे आहोत ना? प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे संगीताचा आनंद द्यावा घ्यावा. फार वेळ लागत नाही खर्च करायला. जाता येता कधीही आपण संगीताला, “मेहसूस’ करून घेऊ शकतो, “जाणवून’ घेऊ शकतो.
या विषयाचा अभ्यास, ज्ञान खूप खोल आहे. आपल्या ओंजळीत बसतील तेवढेच आपल्याला वेचावे लागणार आहे. आपले सगळे आयुष्यसुद्धा कमी पडेल याचा आनंद घ्यायला. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नकळत मिळत जातील. आपल्या अडीअडचणी कधी सुटल्या ते कळणार पण नाही. अरुणजींनी म्हटल्याप्रमाणे, “शतदा प्रेम’ करावेसे वाटेल.
आपण जेव्हा ठरावीक चाकोरीमध्ये आयुष्य जगत असतो तेव्हा आपल्याला आपल्यासोबत, पुढे मागे कोण आहे, संपत्ती व भौतिक साधने किती आहे ते माहीत असते, पण जेव्हा आपले ध्येय, संपत्ती व भौतिक साधने व प्रिय व्यक्तीची सोबत याबद्दल आपण अनिश्चित असतो. किंबहुना या “खास’ जागा रिकाम्याच असतात, तेव्हाच आपले जगणे सुरू होते. अशा वेळेस, “संगीत’ हे आपले चिरंतन “सोबती’ होऊन जाते.
आजारी व्यक्तीला किंवा अंथरुणावर खिळून पडलेल्या व्यक्तीला संगीत ऐकवले तर खूप चांगला परिणाम होतो. या सांगितिक सोबतीने आपले आयुष्य तेजस्वी होते, व्यक्तिमत्त्व उजळून जाते. “संगीत’ हा सक्तीने “शिकण्या-शिकवण्याचा’ विषय नाही, तर ते “जगण्या-जगविण्याचे’ माध्यम आहे. कोणत्याही लिंग-भेद, जात-धर्म या पलीकडचे. बाबूजींनी वर्णन केल्याप्रमाणे, “फिटे अंधाराचे जाळे’ खरेच एक दिवस “आकाश मोकळे’ व्हायला वेळ नाही लागणार.
मेघना कालेकर