लोणी धामणी -गेल्या दिड वर्षांपासून करोना महामारीमुळे देशातील-राज्यातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. सध्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षांपुढील विद्यार्थी अजूनही परवानगी अभावी लसीकरणा पासून वंचित आहेत.
केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठयानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे. केंद्र सरकारने जशी संपूर्ण जनतेची लसीकरणाची जबाबदारी उचलली आहे.
त्यानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसींचा पुरवठा करून महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून करण्यात आली आहे. केंद्र सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा.
अशा विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्द्यांकडे वेधले जाणार आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान आहे. हे नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित असून केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
ही मागणी पूर्ण न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या सूचनेनुसार राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पुणे विभागीय उपाध्यक्ष संकेत वायकर यांनी दिला आहे.