नवी दिल्ली – करोना काळात देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बॅंकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने बॅंकिंग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बॅंकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी झाली. आजच्या बैठकीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऍसेट री-कन्स्ट्रक्शन कंपनी नावाच्या बॅड बॅंकेची घोषणा केली.
बॅंकांच्या आर्थिक स्थितीबाबत निर्मला सीतारामन म्हणाल्या, गेल्या सहा वर्षांत 5 लाख कोटींपेक्षा अधिक वसुली झाली. मार्च 2018 पासून 3 लाख कोटींहून अधिक वसुली झाली. गेल्या सहा वर्षात बॅंकांच्या मालमत्तेत बरीच सुधारणा झाली.
सरकारने उचललेल्या पावलांमुळे बॅंकांची आर्थिक स्थिती बरीच सुधारली. 2018 मध्ये देशात 21 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका होत्या आणि केवळ 2 बॅंका नफ्यात होत्या. 2021 मध्ये फक्त दोन बॅंकांनी तोटा नोंदवला. यामुळे बॅंकांच्या ताळेबंदात बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येते.
येत्या पाच वर्षांसाठी या 30 हजार 600 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
त्यासाठी नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात येईल. याद्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गॅरंटीची तरतूद करण्यात आली आहे. एनएआरसीएलकडून दिल्या जाणाऱ्या सेक्युरिटी रिसीटसाठी ही गॅरंटी असेल. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील असेट्री कन्स्ट्रक्शन कंपनी उभारण्याविषयी घोषणा करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.