लखनौ, फतेहपूर – उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे भिंत पडण्याच्या विविध घटनांमध्ये 6 जण ठार झाले आहेत. उत्तर प्रदेशातील फतेहपूर, प्रतापगढ आणि कौशंबी या जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या आहेत. प्रतापगढ आणि अयोध्या या भागात गेल्या 24 तासांत 20 सेमी पावसाची नोंद झाली. अनेक भागात पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहतुकीला अडथळा येतो आहे.
फतेहपूरमध्ये काल रात्री एक घर कोसळून त्याखाली दोघी भगिनी गाडल्या गेल्या. याच जिल्ह्यातील मरदाहा गावातील अशाच आणखीन एका घटनेमध्ये एका दाम्पत्यासह त्यांची 2 वर्षांची कन्याही गाडली गेली. घर पडले तेव्हा हे कुटुंब गाढ झोपेत होते. यातील कन्येचा जागेवरच मृत्यू झाला, तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
प्रतापगढ जिल्ह्यातल्या गोडे गावात भिंत कोसळल्याने एकाचा मत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले. गहरीचाक गावातही भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. कौशंबी जिल्ह्यातील बिमेर गावात अशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.