कोल्हापूर (प्रतिनिधी) – येथील टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक येथील छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळाच्या गणपतीच्या अंगावरील दीड किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
राजाराम चौक मित्र मंडळाने पाच फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मूर्तीच्या अंगावर चांदीचे दागिने घातले आहेत. मूर्तीवर दागिने असल्याने रोज रात्री कार्यकर्ते झोपायला असतात. बुधवारी सकाळी झोपलेले कार्यकर्ते उठल्यावर मूर्तीच्या अंगावरील काही चांदीचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी पृथ्वीराज राजेंद्र नरके यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी चोरीबाबत अशी माहिती दिली की, पहाटे तीन ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरी केली असावी. यावेळी मंडपात कार्यकर्ते गाढ झोपेत होते. चोरट्यांनी 1260 ग्रॅम वजनाचे चांदीचे तोडे, दोनशे ग्रॅम वजनाच्या चार चांदीच्या खड्याच्या अंगठ्या असे 68 हजार 620 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.