पुणे- मनपा क्षेत्रातील “ऍमेनिटी स्पेस’ खासगी सहभागाने विकसित करण्याच्या विषयावरून शहरातील राजकारण अक्षरश: पेटले आहे. “भाडे तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या सर्वाधिक ऍमेनिटी स्पेस कोथरूडमध्ये आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी केला होता.
त्यावर कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा बळकावल्या’ असा आरोप मंगळवारी केला. यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर देत, “किती जागा बळकावल्या, याचे उत्तर द्या,’ असे आव्हान पाटील यांना दिले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे राजकारण आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
मनपा क्षेत्रातील “ऍमेनिटी स्पेस’ खासगी सहभागाने विकसित करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपप्रचार चालवला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी किती ऍमेनिटी स्पेस बळकावल्या व त्यांची भाड्याची किती रक्कम थकीत आहे. तसेच महाविकास आघाडीने ऍमेनिटी स्पेससाठी 15 ऐवजी 5 टक्के जागा सोडण्याचा निर्णय घेऊन काही लोकांचा कसा फायदा करून दिला आहे, याची माहिती दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पत्रकार भवन येथे पत्रकरांशी पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या निर्णयावर विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. “मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता मातोश्रीतून निर्णय घेतात आणि जनतेवर निर्बंध घालतात. पण त्यांनी जनतेची मानसिकता समजून घ्यावी. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. त्याला दीड वर्षे डांबून ठेवल्यावर अजून बंधनात ठेवता येणार नाही, हे लक्षात घेऊनच निर्बंध घालावे लागतील. मुलांना अधिक काळ शाळांपासून दूर ठेवले तर त्यांच्यावर मानसिक परिणाम होतील.
सरकार सतत निर्बंध लादून कारवाया करणार असेल तर त्यातून असंतोष निर्माण होईल,’ असे पाटील यांनी सांगितले. महिलांच्या रक्षणासाठी शक्ती कायद्याला सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष हवा हा विषयही ऐरणीवर आलेला आहे,’ असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
परप्रांतियच असे गुन्हे करतात का?
साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगतानाच परप्रांतातून येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, “केवळ परप्रांतियच अशा प्रकारचे गुन्हे करतात का, याचा विचार करावा. अशा प्रकारे एखाद्या समाजाला लक्ष्य योग्य नाही.’