नवी दिल्ली – भाजपने मागील काही महिन्यांत आपली सत्ता असणाऱ्या तीन राज्यांत नेतृत्वबदल केला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले विजय रूपाणी हे त्या पक्षाचे चौथे मुख्यमंत्री ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे दिसले.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कितीही सूर घुमले तरी त्यांना अभय मिळत असल्याचेच दिसून आले. त्यामुळे 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत भाजपने आनंदीबेन पटेल यांच्या रूपाने केवळ एक मुख्यमंत्री बदलला. वयामुळे पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले. मात्र, पंतप्रधान म्हणून मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपने मुख्यमंत्र्यांविषयी वेगळे धोरण अवलंबल्याचे दिसते. त्या पक्षाने याआधी उत्तराखंडमध्ये दोन मुख्यमंत्री बदलले. त्याशिवाय, कर्नाटकातही नेतृत्वबदल केला.
त्यामुळे देशात करोना संकट दाखल झाल्यानंतर जमिनीस्तरावरील स्थितीचे अवलोकन करून भाजपने फेरबदलांचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. त्या पक्षाकडून जनतेला सातत्याने चांगल्या आणि प्रभावी प्रशासनाचे आश्वासन दिले जाते. आता आपल्या सुशासन मॉडेलला पुन्हा राजकीय लकाकी देण्यासाठी भाजपने फेरबदलांचा फंडा अवलंबल्याचे मानले जात आहे. तो फंडा मोदी यांनी स्वत:च्या मंत्रिमंडळाबाबतही वापरला.
काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळातही व्यापक फेरबदल करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रीही बदलण्यात आले. करोना संकट हाताळणीवरून विरोधक भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे करोनाविरोधी लढ्यात अपयशी ठरल्याचा शिक्का बसू नये यासाठीही त्या पक्षाकडून विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.