पुणे – घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या निषेधार्त पुणे शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने भवानी पेठेमध्ये गणरायाच्या चरणी साकडे आंदोलन करण्यात आले. या सरकारला सुबुध्दी मिळो व महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात संघर्ष करण्याची व लढा देण्याची ताकत मिळो ही प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली.
भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या उपस्थितीत व भाजपा महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अश्विनी पवार, रेश्मा सय्यद, गायत्री भागवत, रेखा चोंदे, कांचन कुंबरे, विजया भोसले, माधुरी गिरमकर, परवीन तांबोळी यांच्यासह अन्य महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी खापरे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर ठाकरे सरकार तसेच प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. कारण सध्या असलेले महाराष्ट्रतील ठाकरे सरकार हे अत्यंत निष्क्रिय असून महिलांच्या बाबतीत बेजबाबदार आहे.
महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून महाराष्ट्रातील महिलांच्या व्यथा समजून घ्याव्यात व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी करावी. तर कार्यक्रमाच्या आयोजक अर्चना तुषार पाटील म्हणाल्या की, महिलांच्या सुरेक्षेच्या व संरक्षणाकरीता असलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी का होत नाही ? त्याचप्रमाणे महिला आयोगाला अध्यक्ष का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी सरकारकडे उपस्थित केला.
महिलांवर अत्याचार तिघाडी सरकार नुसते बघत आहे. पोलीस प्रशासन ही राजकीय दबावाला बळी पडत आहे. यामुळे महिलांना न्याय मिळत नाही. आता तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जागे व्हा आणि महाराष्ट्रातील महिलांच्या व्यथा जाणून घ्या.