जयपूर : देहराडूनमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. याठिकाणी होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर तणावाखाली असलेल्या एका जवानाने स्टेटसवर तिच्या नावाने संदेश लिहून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील कोटा येथे ही घटना घडली आहे. आत्महत्या करणारा जवान पप्पूलाल हा लष्करामध्ये देहराडूनच्या कुमाऊँ रेजिमेंटमध्ये तैनात होता. सध्या तो सुट्टीवर गावी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार या जवानाच्या होणाऱ्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचा धक्का या जवानाला बसला होता. दरम्यान, रात्री या जवानाने व्हॉट्सअॅपवर जया, तू नाही, तर मीसुद्धा नाही, असे स्टेटस लिहिले त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह चेचट पोलीस ठाणे क्षेत्रातील देवली कला गावामध्ये शेतात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पूलालचा स्टेटस पाहून मित्रांनी त्याला याबाबतचे कारणही विचारले. मात्र त्याने काही रिप्लाय दिला नाही. दरम्यान, पोलिसांनी मोबाईल फोनवर स्टेटस लावल्याच्या बाबीला दुजोरा दिलेला नाही. पप्पूलाल याच्या फोनला लॉक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत जवानाचा हल्लीच चित्तोड जिल्ह्यातील प्रतापनगरमधील जया कुमारी हिच्याशी साखरपुडा झाला होता. ती बीएससीच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तीन दिवसांपूर्वी तिने खोलीमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.
पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये मृत जवानाच्या मोठ्या भावाने पप्पूलाल हा तणावाखाली असल्याचे सांगितले. दरम्यान, लष्करातील युवा जवानाचा मृत्यू झाल्याने रविवारी गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. ग्रामस्थांनी पप्पूलाल हा चांगल्या स्वभावाचा होता, असे सांगितले. तसेच तो जेव्हा गावात यायचा तेव्हा देशभक्तीच्या गोष्टी सांगायचा, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
चेचटचे पोलीस अधिकारी राजेंद्र प्रसाद मीणा यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी पप्पूलाल सुट्टी घेऊन गावी आला होता. तो रविवारी सकाळी शेतात जाण्यासाठी निघाला. मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सध्या चेचट ठाणे पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.