मुंबई – राज्यातील धार्मिक स्थळं करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली आहेत. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना देखील धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलेला नाही. सरकारने धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आपले वजन धार्मिक स्थळं खुली करण्याच्या पारड्यात टाकलं असून १० दिवसांत याबाबतचा निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
अशातच अण्णा हजारे यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे परामौख राज ठाकरे यांनी चांगलाच चिमटा काढला आहे. राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत प्रश्न विचारला असताना, ‘अण्णा होते कुठे इतके दिवस?’ असं म्हणत त्यांना चिमटा काढला.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने देखील, ‘येत्या ८ दिवसांत धार्मिक स्थळं खुली करा अन्यथा उग्र आंदोलनांना सामोरे जा’ असा इशारा दिला आहे.
आज राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील धार्मिक स्थळं खुली न केल्यास घंटानाद आंदोलनं करू असा इशारा दिला आहे.