मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर संपूर्ण जगाला ज्या गोष्टीची चिंता होती तीच घटना काबूलच्या विमानतळावर गुरुवारी घडली. त्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने सामनातून यावर भाष्य केले आहे. आज काबूल रक्ताने माखले, उद्या कुठे रक्तपात होईल हे कोणीच सांगू शकत नाही. खरं तर मानवतेचा खून करण्याची शिकवण कुठलाच धर्म देत नाही, पण तरीही जिहादच्या नावाखाली जगभरात माणुसकीचे मुडदे पडतायत ते भीषण आहे, असे विचार अग्रलेखातून मांडण्यात येत आहेत.
अफगाणिस्तानात तख्तपालट झाल्यापासून तिथे भयंकर रक्तपाताची जी भीती व्यक्त केली जात होती, ती दुर्दैवाने खरी ठरली आहे. तालिबान्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता बळकावल्यापासून तेथील जनता जीव मुठीत धरुन जगते आहे.
काहीतरी आक्रित घडणार अशी चिंता साऱ्या जगाला पडली होती. झालेही तसेच. अफगाणची राजधानी काबूलच्या विमानतळाबाहेर गुरुवारी लागोपाठ तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. या धमाक्यांमध्ये 100 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये अमेरिकेचे 13 सैनिक, 28 तालिबानी आणि अफगाणिस्तानच्या 60 निरपराध नागरिकांचा समावेश आहे.
याशिवाय अमेरिकेचे अनेक सैनिक व तालिबानी या भयंकर दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इसिसचा खोरासन गट आणि तालिबानमध्ये असलेल्या वैरातून हा दहशतवादी हल्ला झाला असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेने प्रशिक्षित केलेल्या 3 लाख अफगाणी सैनिकांनी जेमतेम 80 हजार तालिबान्यांपुढे गुडघे टेकले आणि देशवासीयांना वाऱ्यावर सोडून तिथले राष्ट्राध्यक्षही पळून गेले. या सगळ्याच घडामोडी रहस्यमय आहेत.
अफगाणिस्तानात स्फोटाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांच्या शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या. छिन्नविछिन्न मृतदेह, रक्तामांसाचा चिखल आणि जखमींची वेदनांमुळे होणारी तडफड असे घटनास्थळावरील मन विषण्ण करणारे दृश्य पाहून दगडालाही पाझर फुटला असता. मानवतेचा खून करण्याची शिकवण खरे तर कुठलाच धर्म देत नाही. मात्र, कधी तालिबान, कधी इसिस, कधी अल कायदा, कधी तोयबा व जैशसारख्या इस्लामी दहशतवादी संघटना जिहादच्या नावाखाली जगभरात माणुसकीचे मुडदे पाडत सुटल्या आहेत.
पुन्हा दहशतवाद्यांचे जागतिक केंद्र असलेला पाकिस्तानसारखा देश कोणालाही भीक न घालता माणुसकीच्या या शत्रूंचा पोशिंदा बनला आहे. त्याचे भक्कम पुरावे असूनही जागतिक समुदाय पाकिस्तान व जगभरातील सर्व दहशतवादी संघटनांना एकजुटीने धडा शिकवत नाही तोपर्यंत हे दहशतवादी हल्ले असेच सुरू राहतील.
आज काबूल रक्ताने माखले, उद्या कुठे रक्तपात होईल हे कोणीच सांगू शकत नाही. अफगाणिस्तान तर कित्येक वर्षे युद्धात जळतो आहे. कुठल्याही देशाने भोगल्या नसतील एवढय़ा नरकयातना अफगाणिस्तानचे नागरिक वर्षानुवर्षे भोगत आहेत. कधी रशिया, कधी अमेरिका तर कधी पाकिस्तान अफगाणच्या भूमीचा हवा तसा वापर करतो. त्यात फरफट होते ती अफगाणच्या सामान्य जनतेची. अफगाणिस्तानला आणखी किती काळ दुर्दैवाचे हे दशावतार भोगावे लागतील हे सध्या तरी कोणीच सांगू शकत नाही!