पुणे – पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून पालघन, कोयते हातात घेऊन सय्यदनगर येथील गल्ली क्रमांक अकरा मध्ये दहशत माजवत एकावर हत्याराने वार करून 27 हजार 500 रूपये जबरी चोरी करणार्या टोळक्यावर वानवडी पोलिस ठाण्यात दरोडा, हत्यार बाळगणे व धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चौघांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शादाब मेहबुब सय्यद (18), बरकत अली अस्लम शेख (19), जुबेर माबुत खान (19) आणि नासीर रसुल शेख (19) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. गुप्या, अफताब, मुजमील व त्यांचे तीन साथीदार अशांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत मुजीब गालिब तांबोळी (25, रा. मंगळवारपेठ, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुजीब तांबोळी हे मंगळवार पेठेत राहण्यास आहेत. ते त्यांचा कामगार अफशान याला कामाचे पैसे देण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता गेले होते. आरोपी आणि एका व्यक्तीमध्ये पाणी उडाल्यावररून सय्यदनगर गल्लीनंबर 11 मध्ये वाद झाले होते. याच वादाच्या कारणावरून फिर्यादी मुजीब हे त्यांचा कामगार अफशान शेख याच्याकडे गेल्यानंतर गल्लीत उभे असताना आरोपींनी हातात कोयता, पालघन सारखी हत्यारे घेऊन येत जोरजोरात आरडा ओरडा करून दहशत पसरवली.
हम यहा के भाई है, सबको देख लेंगे म्हणून शिवीगाळ सुरू केली. परंतु, मुजीब तांबोळी यांचा भांडणाशी काही संबंध नसताना गुप्या नावाच्या आरोपीने पालघनने मुजीब तांबोळीवर वार केले. इतर आरेापींनी त्यांना मारहाण करून त्यांना दुखापत केली. दरम्यान, फिर्यादी यांनी त्याच्या कामगाराला देण्यासाठी आणलेले 27 हजार 500 रूपये खिशातून काढून घेतले. घटनेची माहिती समजताच परिमंडळ 5 च्या उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांनी घटनास्थळी भेट दिली.
पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून आरोपींपैकी काहींचे गल्ली राहणार्या एकाबरोबर वाद झाले होते. सोमवारी सायंकाळी फिर्यादी हे त्यांच्या कामगाराला कामाचे पैसे देण्यासाठी गेले असताना तेच आरोपीच्या हाताशी लागले. त्यांनी पाण्यावरून वाद घालणारी व्यक्ती समजून मुजीब तांबोळी यांच्यावर वार केले. दरम्यान, त्याच्याजवळील रक्कमही काढून घेतली. त्यांच्यावर हल्ला करणार्यांपैकी काही जणांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. – दिपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी.