– शर्मिला जगताप
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेणारी क्रांतिकारी महिला म्हणजे अरुणा असफ अली. आज त्यांचा स्मृतिदिन. पंजाबमधील कालका येथे 16 जुलै 1909 रोजी त्यांचा जन्म झाला.
पुढे त्यांचे कुटुंब कलकत्ता (आताचे कोलकाता) शहरात स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील प्रॉटेस्टंट विद्यालयात झाले. त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे काम केले. त्यांचे पूर्वीचे नाव अरुणा उपेंद्रनाथ गांगुली. 1928 मध्ये मुस्लीम वकील असफ अली यांच्याशी त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. लग्नासमयी त्या 19 वर्षांच्या होत्या तर असफ अली 23 वर्षांनी मोठे होते. अर्थातच त्यांच्या कुटुंबीयाचा या लग्नास विरोध होता.
असफ अली हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे त्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्या. सभा, प्रभातफेऱ्या यामध्ये त्यांचा सहभाग वाढला. 1930 व 1932 च्या कायदेभंग चळवळीत त्या सहभागी झाल्या. महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावेळीही त्या सहभागी होत्या. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना एका वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली. 1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवले होते. मात्र, तुरुंगात असतानाही त्यांनी तुरुंगातच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहातही त्या सहभागी झाल्या.
8 ऑगस्ट, 1942 रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबई येथे गवालिया टॅंक मैदानावर होणार होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली होती. यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली होती. गवालिया टॅंक मैदानावर पोलिसांचा पहारा होता. अशा वेळी पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणा असफ अली यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला. ऑगस्ट क्रांतिदिनाच्या त्या वीरांगना ठरल्या. पुढे चार वर्षे म्हणजे 1946 पर्यंत भूमिगत राहून त्यांनी चळवळीला हातभार लावला. लिंक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले.
1947 मध्ये दिल्ली प्रदेश कॉंग्रेस समितीच्या त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. 1958 मध्ये अरुणा असफ अली या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्या अमेरिकेत भारताच्या राजदूत होत्या. उच्चपदस्थ राहूनही त्यांचे राहणीमान साधेच होते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यानंतर आणि महात्मा गांधींच्या प्रभावामुळे त्यांनी आयुष्यभर खादीचे कपडे वापरले.
सोव्हिएत लॅंड नेहरू पारितोषिक (1955), लेनिन शांतता पुरस्कार (1975), आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार (1991) आदी पुरस्कार त्यांना मिळाले. त्याचबरोबर भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 1992 मध्ये “पद्मविभूषण’ पुरस्कार दिला. 29 जुलै 1996 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. 1997 मध्ये त्यांना मरणोत्तर “भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.