साठेबाजींच्या पाठीराख्यांना मतदान करू नका
लखनौ, ता. 28 – जे खासदार व आमदार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या साठेबाजी व भेसळ प्रकरणात दोषी ठरले आहेत त्यांना आगामी निवडणुकीत मतदारांनी मतदान करू नये, असे आवाहन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी केले. साठेबाजी व भेसळ थांबविली पाहिजे. हे गुन्हे करणाऱ्यांना कडक शासन केले पाहिजे.
लष्कराची तांत्रिक हालचालीची क्षमता वाढवा- ले. ज. भगत
पुणे – लष्करास तांत्रिक हालचाली त्वरित करता येतील या दृष्टीने आपली क्षमता विकसित करण्याचे आवाहन भारतीय लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. भगत यांनी केले. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करण्याची क्षमताही आपल्यात असली पाहिजे. हाती घेतलेले काम पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.
कापूस बिया आता खाता येतील!
नवी दिल्ली – अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी कापसाच्या बियांमधील “गॉसिपॉल’ नामक विषारी पदार्थ निराळा काढून टाकण्याची पद्धत तयार केली आहे. त्यामुळे राहिलेला पदार्थ मनुष्य प्राण्यास खाद्य म्हणून वापरता येईल. भारतासारख्या देशात जेथे अन्नधान्याचा तुटवडा असतो अशा देशांना ही पद्धत वरदान ठरणारी आहे. कापसाच्या बियांमध्ये प्रथिनाचे प्रमाण मोठे असते. या पद्धतीनुसार प्रथम या बियांची पावडर करून नंतर ती पावडर “सायक्लोन’ द्रव्यात निवळली जाते.
हे द्रावण नंतर ढवळण्यात येते. यावेळीच प्रथिन पदार्थ द्रावाच्या पृष्ठभागावर येतो व “गॅसिपॉल’ पासून वेगळा केला जातो. असा प्रकार उपलब्ध झालेल्या पदार्थामध्ये 60 ते 70 टक्के प्रथिने असतात. इतर अन्नपदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये मिसळून याचा वापर करता येतो.