टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडला पराभूत करत थाटात सुरुवात केली होती. मात्र, रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून तब्बल सात गोल स्वीकारले व आजवरच्या सर्वात लाजिरवाण्या पराभवाची नोंद केली.
हॉकी स्पर्धेच्या ए गटातील या लढतीत अत्यंत ढिसाळ बचावाचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 7-1 असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे, तर भारतीय संघाने एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. शनिवारी भारताने न्यूझीलंडवर 3-2 असा विजय मिळवला होता.
रविवारी झालेल्या सामन्याच्या पहिल्या हाफपासूनच ऑस्ट्रेलियाने भारतावर वर्चस्व राखले. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला त्यांनी पहिला गोल केला. त्यानंतर 21 व्या मिनिटाला दुसरा गोल करत 2-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर लगेचच 23 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत वर्चस्व सिद्ध केले.
दुसऱ्या हाफमध्ये 26 व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाने ही आघाडी 4-0 अशी वाढवली. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणासमोर भारताचा बचाव अत्यंत सुमार ठरला. दुसऱ्या हाफमध्ये 34 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल केला. मात्र, तोपर्यंत हा सामना भारताच्या हातातून जवळपास सुटलेलाच होता. प्रचंड निराशा भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
ऑस्ट्रेलियाने याच परिस्थितीचा लाभ घेताना 40 व्या मिनिटाला पाचवा गोल करत भारताच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. 42 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सहावा गोल करत भारतीय खेळाडूंवर दडपण कायम राखले. त्यानंतरही भारतीय खेळाडूंच्या खेळात आत्मविश्वास दिसला नाही. ऑस्ट्रेलियाने सातवा गेल करत सामना संपण्यापूर्वी भारतीय संघाला संपूर्ण नेस्तनाबूत केले.
पुढील सर्व सामने महत्त्वाचे
हॉकीचे गतवैभव मिळवण्यासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सज्ज झालेल्या भारताला रविवारीच्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. आता स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी पुढील तीनही सामने जिंकणे अत्यावश्यक बनले आहे. भारताचे या फेरीत आता स्पेन, अर्जेंटिना व यजमान जापान या संघांशी सामने होणार आहेत. या तीनही सामन्यांत विजय मिळवला तरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहणार आहे.