गुरूविण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्लभ
अवघड डोंगर वाट
आयुष्यात आपल्याला पदोपदी गुरूची गरज पडते. काही अवघड प्रसंग आला, निर्णय घेता येत नसला की, आपण गुरूचा आधार घेतो. सगळं ठीक ठाक चाललेलं असेल, तर ते तसंच राहावं म्हणून गुरूला प्रार्थना करत असतो.
गुरू म्हटले की, आपल्याला अध्यात्मिक गुरू ही संकल्पनाच परिचित आहे. पण इतरही अनेक गुरू आपल्याला भेटतात. पहिले गुरू आपले आई-वडील असतात. जे आपल्याला मूलभूत शारीरिक क्रिया शिकवतात. जगात योग्य प्रकारे वागावं यासाठी तयार करतात. बोलणं, जेवणं, चालणं शिकवतात. शब्द शिकवतात. कुटुंबातील नात्यांची ओळख करून देतात. आपलं अनौपचारिक शिक्षण घरातच होतं. मातीच्या गोळ्याला आकार दिला जातो.
त्यानंतर सुरू होते औपचारिक शिक्षण. आपले शिक्षक आपल्या शिक्षणाचा ओनामा करतात. आपल्याला अर्थार्जनासाठी तयार करतात. जगण्यासाठी लायक बनवतात. आपले व्यक्तिमत्त्व घडवतात. त्यांचं स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वाचं असतं. बालवाडी ते थेट उच्च शिक्षणापर्यंत ते आपले दुसरे गुरू.
नंतरच्या काळात पदोपदी गुरू भेटत असतात. ते तुम्हाला जगात व्यवहार कसे करावेत, माणसं कशी ओळखावी, समस्यांमधून बाहेर कसं पडावं, दैनंदिन आयुष्यातले प्रश्न कसे सोडवावे याविषयी मार्गदर्शन करतात.
भाजी बाजारात गेले की भाजी विकणारी व्यक्ती एकाच वेळेस एवढे ग्राहक असूनही प्रत्येकाने किती, काय भाजी घेतली हे लक्षात ठेवते आणि अचूक हिशेब करते. याचं आश्चर्य वाटतं. हिशोब करणं तिच्याकडून शिकावंसं वाटतं. बसमध्ये एवढे प्रवासी असतात; पण कोण तिकीट काढायचं राहिलयं, हे कंडक्टरला बरोबर माहिती असतं. खरं तर चेहरेही काही फार वेगळे नसतात. पण कंडक्टरही आपल्याला बरंच काही शिकवून जातात.
आपले अनुभव हा आपला मोठा गुरू असतो. शिवाय “पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने आपण शिकतच असतो. आयुष्यात चांगला गुरू भेटणं यासारखी सुखाची गोष्ट नाही. कविता नरवणे, डॉ. तिलोत्तमा दासवानी, डॉ. आनंद करंदीकर असे गुरू आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर लाभले त्यांनी जगणं शिकवलं. संगीत, नृत्य या कलांमध्ये गुरूला फार महत्त्व असते. गुरू, शिष्यांना आपल्याबरोबर मैफिलीत साथ द्यायला बसवतात आणि स्वतंत्र मैफिलीसाठी तयार करतात. क्रीडा क्षेत्रातले गुरू खेळाडूंना तरबेज करत असतात. हे एकीकडे तर एकलव्यासारखे शिष्य दुसरीकडे.
काहीजण स्वतःच स्वतःचे गुरू बनतात, हे तर फारच चांगलं. आपण स्वतःचा बारकाईने अभ्यास करणे, आपल्या क्षमता ओळखणे, ध्येय ठरवणे त्याची वाटचाल कशी करायची याची आखणी करणे. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करणे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल करणे. हे सगळं जमण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे.
कधीकधी तर चक्क लहान मुले आपले गुरू बनतात, त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळं असल्याने कधीकधी समवयस्क गुरू बनतात. शाळेत, कॉलेजात असताना एखादा विषय कठीण वाटत असेल, तर तो मित्र किंवा मैत्रीण शिकवतात.
गुरूगृही राहून शिक्षण घेताना गुरूच्या व्यक्तिमत्त्वात विलिन होऊन जाते ते अद्वैताचे नाते होते. त्या गुरू-शिष्यांमध्ये विलक्षण साधर्म्य निर्माण होते. शिष्याचा गुरूवर अपरंपार विश्वास असतो. ज्यामुळे गुरू सांगेल ती प्रत्येक गोष्ट मान्य केली जाते. असं हे नातं आणि त्याचा महिमा.
डॉ. नीलम ताटके