पुणे – पाऊस तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी, तसेच जेचे धोके टाळण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. मुसळधार पावसामुळे ज्या भागात पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. दुपारपर्यंत भेरकराईनगर व देहूरोड परिसरातील दोन उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने भर पावसात दुरुस्ती काम सुरू होते. तर, झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटणे व फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे आदी प्रकारांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम युद्धपातळीवर सुरु होते. वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
तसेच विभागस्तरीय दैनंदिन नियंत्रण कक्षाकडून वीजपुरवठ्याबाबत माहिती, वीजयंत्रणेचे नुकसान तसेच इतर आवश्यक माहितीचा आढावा परिमंडलस्तरावर घेण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
मुळशी, मावळात मोठे नुकसान
मुळशी व वडगाव मावळ भागात झालेल्या वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणचे 12 वितरण रोहित्र. लघुदाबाचे 26 आणि उच्चदाबाचे 11 वीजखांब जमीनदोस्त झाले. मात्र युद्धपातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.