पुणे –पूर आणि दरडप्रवण गावांमध्ये यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, तालुका व गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी मुख्यालयी राहून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी. बाधित गावांतील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे. त्यांना सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती, पूरप्रवण गावे, दरडप्रवण गावे, व झालेल्या नुकसानीबाबत तालुकास्तरीय यंत्रणेसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेत सूचना केल्या. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, “नियंत्रण कक्ष दक्षतेने कार्यान्वित करा तसेच पाऊस कमी झाल्यावर नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत. शासकीय मालमत्तेच्या प्राथमिक नुकसानीचे अहवाल संबंधित यंत्रणेने सादर करावेत.’जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही यावेळी सुरक्षेबाबत सूचना दिल्या.
पूरस्थितीमुळे तसेच दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद राहणार नाहीत, याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी. शहरालगतच्या प्रकल्पातील पाणीसाठा व विसर्ग याबाबत सातत्याने नियंत्रण व समन्वय ठेवावा.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी