नवी दिल्ली – संसदेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संसदीय समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडे आहे. त्याचा लाभ घेऊन या समितीने पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून या संबंधात समितीने माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनीकुमार वैष्णव, गृहमंत्री अमित शहा आणि दूरसंचार मंत्र्यांना समितीपुढे हजर राहण्याची सूचना करण्याचे योजले आहे.
ही समिती स्वत:हूनच या विषयाची स्वतंत्र चौकशी करणार आहे. समितीच्या अध्यक्षांना तसा अधिकार आहे, पण सरकारकडून त्यांना किती सहकार्य मिळणार हे पाहाणे रंजक ठरणार आहे. सरकारने शेकडो लोकांची या सॉफ्टवेअर मार्फत हेरगिरी चालवली होती ही बाब उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पण ती मागणी सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे शशी थरूर यांच्या समितीमार्फत ही चौकशी सुरू करण्याची खेळी कॉंग्रेसने केली आहे.