कोलकाता – पेगॅसस प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वत:हूनच चौकशी केली पाहिजे कारण मोदी सरकारच्या एकतर्फी कारभारापासून न्यायालयच देश वाचवू शकते असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारकडून देशातील लोकशाहीच संपुष्टात आणली जात असून याच्या विरोधात सर्वच विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहनही त्यांनी केले. हुतात्मा दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याही फोनवर पेगॅसस मार्फत पाळत ठेवली जात होती. ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले की येत्या 27 किंवा 28 तारखेला आपण दिल्लीत जात आहोत. त्यावेळी तेथे विरोधी नेत्यांशी चर्चा करणार आहोत असेही त्यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या की प्रसार माध्यमे, न्यायालये आणि निवडणूक आयोग ही लोकशाही संस्थांमधील महत्वाची साधने आहेत पण पेगॅससने या तिन्ही क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे.