नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गाच्या कामासाठी माजी खासदारांच्या काळात पाठपुरावा झाला हे मान्य आहे, पण लोकशाहीत मिळालेली खुर्ची ही ठराविक काळापुरतीच असते त्यावर बसणारा माणूस निमित्तमात्र असतो. जनतेची सेवा करणे हे त्याचे काम असते.
राजकारण हे फक्त निवडणुकीपुरती असावे. पण पद गेल्यानंतर आलेली अस्वस्थता आपण महाराष्ट्राबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि जुन्नर विधानसभेतही अनुभवतो आहे,
हे दुर्दैव असून एका वयस्कर नेत्याने असा पोरकटपणा ने वागणे याचे आश्चर्य वाटते, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता लगावला.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील नारायणगाव बायपासचे लोकार्पण शनिवारी (दि. 17) शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते आणि जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, अंकुश आमले, शरद लेंडे, पांडुरंग पवार, मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे, गणपत फुलवडे, दिलीप मेदगे, विकास दरेकर,
तुळशीराम भोईर, सरपंच राजेंद्र मेहेर, बाळासाहेब पाटे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, राजश्री बोरकर, सुजाता डोंगरे पुष्पा खैरे, वैजयंती कोऱ्हाळे,संगीता काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, उर्वरित बायपासची कामे जून 2022 पर्यंत पूर्ण होतील. मी फक्त बोलतो ते संसदेत. तुम्ही पाच वर्षांच्या कारकिर्दीत संसदेत जनतेच्या प्रश्नांसाठी तोंड उघडले नाही.
दीड वर्षांच्या काळात संसदेत अनेक प्रश्न मांडले. 2018 मध्ये युतीचे सरकार असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना नाशिक-पुणे रेल्वेचा प्रस्ताव राज्य सरकार समोर सादर करता आला नाही. ती परवानगी जुलै 2020 मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून मिळवली व भूसंपादनासाठी प्रकल्पग्रस्तांच्या बैठकी घेतल्या असे त्यांनी नमूद केले.
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी स्वतः केलेले एक तरी काम दाखवा ? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, एक हजार कोटींचा निधी बायपास कामांसाठी दोन वर्षांत आणला आहे.
चाकण येथे साडेसहा कोटींचा उड्डाणपूल तर मोशी येथे साडेसहाशे कोटींचा उड्डाणपूल होणार आहे.गेल्या 15 वर्षांत ज्यांना चाकणचे चुकलेले दोन उड्डाणपूल दुरुस्त करता आले नाही त्यांनी डॉ. कोल्हे यांनी काय केले असा प्रश्न विचारू नये, असे त्यांनी नमूद केले.
माजी आमदार शरद सोनवणे यांच्यामुळे नारायणगाव बायपासचे काम काळ्या यादीत टाकले होते. ठेकेदाराने त्यांच्या बीएमडब्ल्यूसाठी किती पैसे द्यायचे. शेवटी ठेकेदाराने काम सोडून दिले. त्यानंतर तालुक्यातील आमदार बदलल्यामुळे नारायणगाव बायपासचे काम सुरू झाले. सत्ता गेल्यानंतर वैफल्य येते हे बरोबर;परंतु आता दगड घेऊन फिरतात की काय असे वाटायला लागले आहे.
– संजय काळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार, नारायणगाव
बाह्यवळणातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविले जातील तसेच रेल्वे सुरू करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवू नये.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर विधानसभा मतदारसंघ