मुंबई – अवघ्या तीन ते चार तासांच्या काळात 197 ते 235 मीमी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत दाणादाण उडवली यात वेगवेगळ्या घटनांत किमान 30 जणांनी प्राण गमावले, अशी माहिती माहापालिकेच्या आपत्कालीन कक्षाने रविवारी दिली आहे.
मुंबईकर झोपले असतानाच हा बेलगाम पाऊस सुरू झाला. अवघ्या तीन ते चार तासांत 197 ते 235 मिमि पाऊस पडल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. चेंबूरमधील वाशीनाका भागात एक झाड भींतीवर कोसळल्याने ती भींत पडून किमान 17 जणांचा मृत्यू झाला. ही दूर्घटना मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास घडली. आत्तापर्यंत 6 जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, या भागामध्ये 50 मीटरच्या अंतरावर दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावपथके दाखल झाली आहेत.
भांडुपमध्ये देखील अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सोहम थोरात असे त्याचे नाव आहे. अंधेरी पश्चिम येथील एका मिठाईच्या दुकानात राहणारा सलीम पटेल या 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या व्यतीरिक्त अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये अन्य 12 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे समजते.
महापालिकेने केलेल्या नोंदीनुसार दक्षिण मुंबईत 177 मिमि, पूर्व मुंबईत 205 मीमी तर पश्चिम उपन्गरात 195 मीमी पावसाची नोंद झाली.अनेक सखल भागात पाण्याचे लोंढे तळमजल्यावरील दुकाने आणि घरांत घुसले.
कोणपट्टीला तडाखा
कालमध्यरात्रीपासून मुंबईसह कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात संततधार वृष्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी पूर आले आहेत.
उपनगरीय रेल्वेला फटका
नालासोपारा आणि विरार या स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्याने उपनगरीय रेल्वे सेवा रद्द करण्यात आली. दादर, सायन, कुर्ला, परेल, चुनाभट्टी आणि टिळकनगर परिसरात ही पुराचे पाणी रुळांवर आल्याने मध्यरेल्वेची सेवा बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले.