हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ।। 1 ।। तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ।। 2 ।।
हरिपाठातील अकराव्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरिनामाचा जप केल्याने अनंत पापाच्या राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्नीरूप होते, त्याप्रमाणे हरिचा जप करीत असले म्हणजे जपणारा हरिरूपच होतो.
हरि या नाममंत्राच्या उच्चाराचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याच्या धाकाने भूतबाधा, पिशाच्चबाधा नाहीशी होते. इतकेच नव्हे तर जीवाच्या मागे लागलेल्या पंचमहाभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते,
म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा हरि सामर्थ्यवान आहे. त्याच्या स्वरूपाचा यथार्थ निर्णय उपनिषदांनाही झाला नाही.