– माधव विद्वांस
हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म गोव्यातील केरी (तालुका फोंडा) या गावी गोमंतकातीय संगीतपरंपरा असलेल्या कुटुंबात झाला. लहानपणी गावात होणाऱ्या गवळणकाला उत्सवात त्या श्रीकृष्णाची भूमिका करत.
वयाच्या आठव्या वर्षी कोल्हापूर येथील त्यांनी किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्याकडे गायन शिकायला आरंभ केला. ही तालीम दहा महिने झाल्यावर गोव्यातील लामगाव व बांदोडे येथे ग्वाल्हेर घराण्याचे पं. रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे सुमारे तीन वर्षे शिक्षण घेतले. वर्ष 1908 मध्ये त्या आई भीमाई व मामांबरोबर मुंबईस आल्या.
तेथे प्रसिद्ध बीनकार व सतारवादक उ. बरकतुल्लाखॉं यांच्याकडे 7 वर्षे त्या गायन शिकल्या. वर्ष 1912 मध्ये उ. अल्लादियाखॉं यांच्याकडूनही अल्पकाळ संगीतशिक्षण घेतले तसेच सुमारे चार महिने पं. भास्करबुवा बखले यांचीही तालीम त्यांना मिळाली. याच सुमारास हिरालाल यांच्याकडून कथ्थक नृत्य व मॅंझलेखॉं यांच्याकडून अदाकारीच्या ठुमरीची तालीम त्यांनी घेतली.
वर्ष 1918 मध्ये एका संगीत मैफलीतील अपमान जिव्हारी लागल्याने त्यांनी जिद्दीने गायनात प्रभुत्व मिळवण्याचा चंग बांधला व तालीम घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अखेरीस सेठ विठ्ठलदास द्वारकादास यांच्या मध्यस्थीने जयपूर-अत्रौली घराण्याच्या अल्लादियाखॉं साहेबांनी काही अटींवर त्यांना शिकवायचे कबूल केले.
1 जानेवारी 1921 रोजी गंडाबंधन समारंभ होऊन केसरबाई खॉंसाहेबांच्या रीतसर शागीर्द झाल्या. त्यांना खॉंसाहेबांकडून शिस्तशीर तालीम मिळाली. त्यांच्याकडून अनेक आम व खास राग तसेच बंदिशींची तालीम मिळाल्यावर केसरबाई मैफलींत आपले गायन सादर करू लागल्या.
त्यांच्या भारदस्त आवाजाने तीनही सप्तकांत “आ’ कारातील आवाजाचा खुलेपणा, दमदारपणा, ख्यालाची भारदस्त बढत, गायनातील ओघवतेपणा ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होती. वर्ष 1938 मध्ये कोलकाता येथील अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांचा सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून गौरव झाला.
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या सूचनेनुसार 1948 साली कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीतर्फे केसरबाईंना “सूरश्री’ हा किताब बहाल करण्यात आला. कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असतानाच 1965 साली त्यांनी जाहीर कार्यक्रमांतून सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली. व्यावसायिक ध्वनिमुद्रणे, रेडिओवरून गायन त्यांना पसंत नव्हते.
मात्र हिज मास्टर्स व्हॉइसचे ध्वनिमुद्रण अधिकारी, गायक जी. एन. जोशी यांनी केसरबाईंना राजी केले आणि मग हिज मास्टर्स व्हॉइस आणि कोलंबिया या ध्वनिमुद्रणसंस्थांसाठी त्यांनी ध्वनिमुद्रणे केली. त्यातील काही पुढीलप्रमाणे- गौरी, काफी कानडा, खंबावती, देश, काफी होरी अशा गायनप्रकारात ध्वनिमुद्रणे केली.
त्यामुळे केसरबाईंच्या गायकीची सर्व वैशिष्ट्ये जतन झाली व आजही या ध्वनिमुद्रिका ऐकता येतात. 1977 साली व्हॉयेजर-1 या अंतराळ यानात मानवी संस्कृतीचे द्योतक म्हणून जगभरातील संगीताचे नमुने सुवर्णांकित ताम्रध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात जतन करण्यात आले.
भारतीय संगीताचे प्रतिनिधित्व करणारे संगीत म्हणून केसरबाईंनी गायलेल्या भैरवीतील “जात कहॉं हो अकेली गोरी’ या ठुमरीच्या ध्वनिमुद्रणाचा समावेश या अंतराळ यानातील मुद्रिकेसाठी केला. याद्वारे केसरबाईंचे गायन अंतरिक्षात पोहोचले. उद्या त्यांच्या जन्मदिनानिमित्त (13 जुलै 1892) त्यांना अभिवादन.