मुंबई – भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचे पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बने राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधकांनी शिवसेनेला चांगलेच डिवचले आहे. शिवसेनानेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे.
आम्ही वाघाच्या काळाजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचां अन् काळीज उंदराचं असं नाही. महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलंय. पण एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचे सर्व अधिकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. आमच्यात कोणतीही गटबाजी वगैरे नाही. आमच्यात फक्त एकच गट आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गट. त्यामुळे राज्यात पाच वर्ष ठाकरे यांच्या नेतृत्वातच सरकार उत्तम काम करणार, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी उत्तम समन्वयानं काम करत आहे”
सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही घाबरणार नाही. असेही राऊत म्हणाले आहेत.
ज्यांच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे. ते प्रेशर टॅक्टिस वापरत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. पण ते महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात आता जे सुरू आहे, त्याला फ्रस्टेशन असं म्हणतात असा टोला राऊतांनी लगावला आहे.
सेनेत दोन गट असल्याच्या चर्चेवर राऊत म्हणाले की, शिवसेनेत एकच ग्रुप आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. कोणतेही गट नाही.