नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये बिघाडी सारखं वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे एवढंच आपल लक्ष्य आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान नाना पटोलेंच्या या टीकेला भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले असून, “सध्या तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय ते पाहा,” असा टोला लगावत काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
पुण्यात काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. “केंद्र सरकारने ज्यावेळी देशात नोटबंदी आणली तेव्हा अनेक जण बँकेच्या रांगेत उभे राहिले. या रांगेत असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी गेला.
पण त्याचदरम्यान गोव्यात एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणजेच आता नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस द्या. जर नोटबंदी फसली, तर मला कोणत्याही चौकात आपण द्याल ती शिक्षा हा प्रधानसेवक घेण्यास तयार आहे. मग आता त्याचं काय झालं?” असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.