पिंपरी -शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जातात. दरवर्षी पायी जाणारी ही वारी गेल्यावर्षी करोनामुळे एसटीमध्ये गेली होती. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने यंदाची वारी देखील एसटीनेच होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार यंदाही राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची “लालपरी’ धावणार आहे. हा पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ लालपरी बसेस देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी दिली.
मात्र, याबाबत अद्याप पुणे एसटी विभागीय नियंत्रकास सूचना आल्या नसल्याने कोणत्या आगाराच्या बसेस यासाठी धावणार हे स्पष्ट झालेले नाही. करोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
19 जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. संबंधित संस्थांनाना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत कळवावे, अशा सूचना स्थानिक महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.