आळंदी- येथे गेल्या 48 तासांत पासून आळंदी परिसरात धोधो पाऊस बरसत असल्याने तसेच मावळात देखील पुरेशा प्रमाणात पाऊस बरसत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पात्रात रात्रीत वाढ झाल्याने इंद्रायणी खळखळून वाहू लागली आहे.
पहिल्याच पावासात इंद्रायणी खळखळून वाहू लागल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. इंद्रायणीत गेली चार महिन्यांपासून असलेली जलपर्णी देखील या वाहत्या पाण्यामुळे निघून गेली आहे, काही ठिकाणी बंधाऱ्याच्या वरती ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकली आहे.
इंद्रायणीची झालेली गटारगंगा म्हणजेच मैलामिश्रित रसायनमिश्रीत गलिच्छ पाणी सर्व वाहून गेले. नवीन पाणी आले त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इंद्रायणी स्वच्छ पाण्याने खळखळू लागली आहे. दरम्यान, या दमदार पावसाचा उपयोग शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार आहे, त्यासाठी शेतकरीवर्ग देखील समाधानी आहे.