मुंबई – आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मिनी विश्वकरंडक म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. आता या स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची आयतीच संधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळणार आहे.
2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. 2017 साली अखेरची चॅम्पियन्स स्पर्धा झाली होती. त्यात अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 180 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या अनेक वर्षांत भारत महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. मात्र, चॅम्पियन्स स्पर्धेचा अंतिम सामना त्याला अपवाद ठरला होता. त्यामुळे यंदा भारत चॅम्पियन्स स्पर्धेत विजय मिळवून पाकिस्तानवर कुरघोडी करण्यासाठी सज्ज बनेल.
भारताला आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मिळाले होते. 2007 मध्ये टी-20 विश्वकरंडक, 2011 साली एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक व त्यानंतर 2013 साली चॅम्पियन्स करंडकही धोनीने भारताला मिळवून दिला होता.
सुपर सिक्स रचना
आयसीसीला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकाची रचना पुन्हा एकदा सुपर सिक्स रचनेची करण्याची इच्छा होती. ही रचना 1999 ते 2007 या कालावधीतील विश्वकरंडक स्पर्धेत होती. एकदिवसीय सुपर लीगचा फायदा झाल्याचे आयसीसीने मान्य केले असून, आता सर्व संलग्न देशांचे मत घेऊन हाच आराखडा पुन्हा तयार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
टी-20 विश्वकरंडकात 20 संघ
आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या संघ संख्येतही वाढ करणार असल्याचे सांगितले असून, संघांची संख्या आता 20 करण्यात येणार आहे. 2024 ते 2030 दरम्यान दर दोन वर्षांनी टी-20 विश्वकरंडक आयोजित केला जाणार असून, त्यात 20 संघ सहभागी होतील.