पुणे – मागील काही वर्षात नवीन सरकारी वकिलांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. राज्य सरकारने नुकत्याच कनिष्ठ न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याबाबत अध्यादेश काढला आहे. याच धर्तीवर नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी ऍड. मगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत अध्यादेश काढणे, ही चांगली बाब आहे. मात्र, 2014-15 नंतर जिल्हा आणि तालुक्यात सरकारी वकिलांच्या नियुक्त्या झालेल्याच नाहीत. अनेक ठिकाणी सरकारी वकिलांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र, नवीन नियुक्त्या झालेल्याच नाहीत.
न्यायालयीन कामकाजासाठी जसे न्यायाधीश गरजेचे आहेत. तसे सरकारी वकिलही आवश्यक आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सरकारी वकील भरण्यात यावेत, अशी मागणी ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.