पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत 15 ते 20 मजूर अडकून पडले होते. यापैकी आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हंटले, “अतिशय दु:खद! उरवडे, मुळशी येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत काही कामगारांचा मृत्यु झाला.ही घटना अतिशय वेदनादायी आहे.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना. ही घटना समजल्यापासून मी सतत जिल्हाधिकारी, पुणे यांच्या संपर्कात आहे.त्यांच्याकडून मी या संपूर्ण घटनेची सातत्याने माहिती घेत आहे.”
अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी लागलीच धाव घेतली आहे.
पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामास येत असतात. अशा परिस्थितीत उरवडे स्थित एस. व्ही. एस. अक्वॉ कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे 15-20 मजूर, यामध्ये महिला मजूर जास्त असून ते अडकून पडले आहेत. आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे.