नवी दिल्ली – देशात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. नवीन करोना रुग्णांची संख्या घटली असून देशातील जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र देशातील करोना रुग्णांची संख्या आणि करोना बळींचे आकडे केंद्र सरकारने लपविल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आकडे लपविल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी केला.
प्रियंका गांधी यांनी फेसबुकवर पोस्ट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला. पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, देशातील लाखो नागरिकांपेक्षा नेत्यांची प्रतिमा महत्त्वाची आहे का, खरी आकडेवारी भारतातील अनेक लोकांना वाचवू शकते. सरकारने आकड्यांऐवजी लोकांच्या रक्षणासाठीचा प्रोपोगंडा का नाही राबवला, असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला.
दरम्यान प्रियंका गांधी यांनी काही उदाहरण देऊन सरकारने जबाबदारी घेण्याची मागणी केली. तसेच सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं. सकारने सुरुवातीपासूनच करोनामुळे झालेले मृत्यू आणि नवीन करोना रुग्णांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात दाखवली. केवळ टेस्टींगची एकूण आकडेवारी सांगितली.
दरम्यान करोना लसीकरणावरूनही प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशान साधला. लसीकरणाची एकूण आकडेवारी दाखविण्यात येते. मात्र त्यात लोकसंख्येचे प्रमाण दाखविले जात नाही. तसेच पहिला आणि दुसरा डोस मिळवून लसीकरणाचा आकडा सांगितला जातो, असही प्रियंका यांनी पोस्टमध्ये म्हटलं.