पुणे -गुळाच्या मागणीत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. गुळाच्या भावात क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारातही गुळाच्या भावात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाची विक्री प्रतिकिलो 45 ते 50 रुपये भावाने केली जात आहे.
महाराष्ट्रात गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. कोल्हापूर, कराड, तसेच लातूर भागातील गुऱ्हाळे सध्या बंद आहेत. ऑक्टोबर ते मार्चपर्यंत पररराज्यांतील गुऱ्हाळे सुरू असतात. तेथील गुळाचा हंगाम आता संपला आहे. त्यामुळे परराज्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख पेठांमधील गुऱ्हाळांमधील उत्पादन बंद आहे. त्यातच मागणी वाढल्याने गुळाच्या भावात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात असलेल्या पाटस, केडगाव, यवत परिसरात गुऱ्हाळे आहेत.
त्यातील बरीचशी गुऱ्हाळे सध्या सुरू आहेत. त्याबरोबरच सांगली, कर्नाटकातील मंडिया भागातील गुऱ्हाळे सुरू आहेत. त्यामुळे तेथील गुळाला मागणी आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.
गुळामुळे प्रतिकार शक्ती वाढते, असे सांगितले जात असून अनेक आयुर्वेदिक काढ्यात गुळाचा वापर केला जातो. अनेक शहरांमध्ये गुळाचा चहा विकणारी उपाहारगृहे नव्याने सुरू झाल्यानेही गुळाच्या मागणीत वाढ झाल्याचे बोथरा यांनी सांगितले. दरम्यान उसाचे भाव वाढले असून, शिल्लक ऊस संपला आहे. मे महिन्याच्या अखेरीस साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची अखेर झाली. एप्रिलपासूनच गुळाच्या भावात तेजी आहे.
असे आहेत गुळाचे भाव
घाऊक बाजारात गुळाचे क्विंटलचे भाव 3200 ते 3600 रुपये आहेत. (दहा किलोची ढेप) बॉक्स पॅकिंगचे (वीस किलो) क्विंटलचे भाव 3600 ते 4500 रुपये आहेत. सेंद्रिय गुळाचे एक क्विंटलचे भाव 4200 ते 4800 रुपये असे आहेत.