मुंबई – गेल्या 24 तासांमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 3 हजार 665 गावांमधील वीजयंत्रणेची प्रचंड हानी झाली आहे. यामध्ये 18 लाख 43 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारपर्यंत पूर्ववत् करण्यात आला आहे.
चक्रीवादळ बाधित उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे निर्देश देण्यात आले असून महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीची कामे अव्याहतपणे करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणच्या 138 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी 78 उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर 706 पैकी 439 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, मोठे व कोविड रुग्णालयांसह ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाइल टॉवर्स, घरगुती ग्राहक आदींचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्याने दुरुस्ती हाती घेतली आहे. यामध्ये चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह 210 पैकी 173 कोविड सेंटर्स व लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा अवघ्या अर्धा ते दोन तासांमध्ये पूर्ववत् करण्यात आला.
उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. आज दुपारपर्यंत चक्रीवादळ बाधित सातही जिल्ह्यांतील 9 लाख 35 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक, 1284 शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना, 765 मोबाइल टॉवर्सचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा येत्या 48 तासांमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अतितीव्र स्वरूप धारण केलेल्या चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेची सर्वाधिक हानी झाली आहे.