कोल्हापूर, दि. 16 – चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांची “औकात’ काढण्याची भाषा करणे चुकीचे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची बाजू अशोक चव्हाण मांडत आहेत. त्यावरून “चंद्रकांत पाटील को गुस्सा क्यू आता है?’ अशा फिल्मी शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दम दिला. त्यावर पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. पण पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर औकातीवर भाषा केली, हे चुकीचे आहे, असे मुश्रीफ म्हणाले. राज्यघटनेतील 102 व्या घटना दुरुस्ती नंतर कायदा करण्याचा अधिकार राज्यांचा नाही. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला आहे.घटना दुरुस्ती झाल्यानंतर मागास आयोग समिती नेमली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायदा चांगला कळतो. केंद्र सरकारने यावर मार्ग काढायचा आहे. सरकारने काय भूमिका घ्यावी हे देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहीत असल्याचा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला.