पुणे -राज्य सरकारने दि. 30 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करताना याबाबतचे निर्बंधही कडक केले आहेत. सुधारित नियमावलीनुसा संचार बंदीच्या काळातील कारवाई करण्याबरोबरच महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांसाठी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना 48 तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करणे तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य शासनाने सदर नियमाची कडक अंमलबाजावणी करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सीमेवरील सर्वत्र आरटीओ चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. यामुळे पुणे शहराकडे मालवाहू ट्रक राज्याच्या सिमेवरच अडकले आहेत.
आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असल्याने ती करण्यासाठी ऐनवेळी चालकांची धावपळ उडत आहे. यातून किलोमीटर ट्रकच्या लाइन राज्याच्या सीमेवर लागल्या आहेत. यामुळे वाहतूकदारांना माल वेळेत पोहचविणे अडचणी ठरत आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांचाही समावेश आहे. याच कारणातून बाजारपेठेत काही गोष्टींचा तुटवडाही जाणवू लागला आहे.
मालवाहू वाहनांचे चालक सतत प्रवास करीत असतात त्यामुळे वारंवार आरटी-पीसीआर टेस्ट करणे अडचणीचे होणार आहे. याबाबत राज्य सरकारने राज्यातील सर्व चेकपोस्टवर सदर टेस्ट करण्याबाबतची यंत्रणा उभी करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे.
– बाबा शिंदे, सदस्य, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट